महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास: सातवाहन राजवंश

महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा नकाशा आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच…..

पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्राची काय ओळख होती. हा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात येत असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात कोणते क्षत्रिय मराठा राजवंश होऊन गेले कोणते राजे होऊन गेले त्याबद्दलची माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत.

तर महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश कोणता…? तर तो आहे सातवाहन राजवंश मग सातवाहनांच्या अगोदर महाराष्ट्रावर कुठल्या क्षत्रीय मराठा राजवंशाने राज्य केले…? तर सातवाहनांच्या अगोदर भाषावार प्रांत नव्हते भाषेनुसार प्रांतांची रचना नव्हती त्या अगोदर भारतात महाजनपत पद्धती होती. या आर्यावार्तामध्ये भारतामध्ये 16 महाजनपद होते त्यापैकी 15 महाजनपद हे उत्तर भारतामध्ये होते आणि #अश्मक हे एक मात्र महाजनपद दक्षिण भारतामध्ये होते. या अश्मक महाजनपदावर भगवान #श्रीरामाचे वंशज म्हणजे #इश्वाकू वंशातील राजे राज्य करीत होते.
भगवान श्रीरामाच्या इक्ष्वाकू वंशातील अश्मक नावाच्या राजाने या महाजनपदाची स्थापना केली म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद म्हटले गेले. अश्मक महाजनपदावर राज्य करणाऱ्या याच इश्वाकू वंशाला पुढे शिसोदे म्हटले गेले. भोसले कुळ याच शिसोदे वंशाची एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच कुळातील म्हणून त्यांना #रघुकुलराज म्हणजेच भगवान श्रीरामाच्या कुळातील म्हटले गेले. याच शिसोदे कुळाची एक शाखा राज्यविस्ताराला उत्तरेत मेवाड ला गेली तिथे शिसोदे चा अपभ्रंश सिसोदिया झाला. या अश्मक महाजनपदाची राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ही होती.
तर हे महाजनपद इसवी सन पूर्व 6 व्या शतकापर्यंत म्हणजे आज पासून 2600 वर्षे पूर्वीपर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतर भाषेनुसार प्रांतांची रचना व्हायला लागली तेव्हा वेगवेगळ्या प्रांतांचा उदय झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये सातवाहन वंशाचा उदय झाला. काही विद्वानांच्या मते सातवाहन शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो भगवान सूर्य देवाच्या रथाला सात घोडे असतात म्हणजे सात – वाहन म्हणून या वंशाला सातवाहन म्हटले गेले सातवाहन हे सूर्यवंशी होते. सातवाहनांची सत्ता आधी फक्त पुणे मावळ प्रांतात होती. ते मूळचे #आंद्रानदी किनारी असलेल्या #अंदरमावळचे होते. म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर अंदर सातवाहन चा आंध्र सातवाहन झाला. (आंध्रप्रदेश शी त्याचा काही संबंध नाही.)

सातवाहन पहिले मौर्य काळात मौर्य साम्राज्याचे सामंत होते. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा कण्व वंशाला सुरुवात झाली तेव्हा सातवाहन कण्व राजांचे सामंत होते. नंतर कण्व वंशातील शेवटचा राजा सुसर्मन ला सिमुक सातवाहन यांनी हरवले व स्वतःला स्वतंत्र घोषित केले. या #सिमुकसातवाहन यांनाच सातवाहन वंशाचा मूळ पुरुष मानले जाते. यांनीच सातवाहन साम्राज्याची म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना केली. महाजनपद नष्ट झाल्यानंतर भारतात अनेक छोटे छोटे प्रांत होते. त्यात दक्षिण भारतात देखील अनेक छोटे छोटे प्रांत होते. त्यात अपरांतक (कोकण), गोमंतक (गोवा), अश्मक (पैठणच्या आसपासचा प्रदेश) , विदर्भ, नासिक्य (नाशिक), कान्हादेश (जळगाव,धुळे) तर या सर्व प्रांतांचा मिळून सिमुक सातवाहनांनी महाराष्ट्र घडवला. सिमुक सातवाहनांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केल्या नंतर #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ला मुख्य राजधानी बनवले व #जीर्णनगर म्हणजे सध्याच्या #जुन्नर ला उपराजधानी बनवले. सातवाहन राजवंशाचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 पर्यंत होता म्हणजे सुमारे 450 वर्ष सातवाहनांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य केले. सातवाहन साम्राज्य संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मध्य प्रदेश आणि गुजरातचा काही भाग मिळून एक मोठे विशाल साम्राज्य होते. सातवाहन साम्राज्याच्या काळात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आपली स्वतंत्र ओळख मिळाली आपण जे आज अभिमानाने स्वतःला मराठी म्हणून घेतो आणि आपली मराठी संस्कृती आपली मराठी भाषा आपल्या चालीरीती रूढी परंपरा ह्या ज्या आहेत त्याची सुरुवात सातवाहन काळात झाली. सातवाहन काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. सातवाहन काळात महाराष्ट्रातील पैठण, जुन्नर, नाशिक, भोकरधन, तेर, नेवासे हे मुख्य प्रसिद्ध व भरभराटीला आलेले शहर होते. तसेच शूरपारक म्हणजे सध्याचे नालासोपारा हे प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर होते. येथून थेट रोमशी आपला व्यापार व्हायचा नालासोपारावरून व्यापारी माल जुन्नर नाणेघाट मार्गे पैठणला आणला जायचा जुन्नर जवळील #नाणेघाट हा व्यापारी मार्ग देखील सातवाहनांनी चालू केला व त्या ठिकाणी एक लेणे देखील खोदले आहे ज्यामध्ये सातवाहन कुळाची माहिती देणारा एक मोठा शिलालेख ब्राह्मी लिपी मध्ये आहे. इतिहासकार सातवाहन राजांना महाराष्ट्राचे निर्माते मानतात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच लेण्यांची निर्मिती सातवाहन राजांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक किल्ले देखील सातवाहन राजांनी बांधले ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला देखील सातवाहन राजांनी बांधला होता. सातवाहनांची राज्यभाषा #प्राकृतमहाराष्ट्री होती लिपी #ब्राम्ही होती तिचेच रूपांतर नंतर मराठी भाषेमध्ये झाले. सातवाहन वंशातील राजा हाल सातवाहन ने #गाथासप्तशती हा ग्रंथ प्राकृत महाराष्ट्री भाषे मध्ये लिहिला आहे. ज्यामध्ये पैठणचे व महाराष्ट्राचे 2000 वर्षांपूर्वीचे वर्णन आहे याला मराठीतील आद्यग्रंथ म्हणता येईल.

सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने वैदिक सनातन हिंदू धर्माचा आणि मंदिरांचा ऱ्हास केला होता वर्ण व्यवस्था आणि गुरुकुल भ्रष्ट केले होते. त्यांना पुन्हा स्थापित करण्याचे काम सातवाहन राजांनी केले. सातवाहन राजांनी वर्ण व्यवस्था सुरळीत करून गुरुकुल उभारले संत आणि ब्राह्मणांना अभय दिले. बौद्ध आणि विदेशी आक्रमकांमुळे नष्ट आणि भ्रष्ट झालेल्या अनेक मंदिरांचे पुनरनिर्माण केले आणि अनेक मंदिरे देखील बांधली.
सातवाहन राजवंशाच्या 450 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण 30 राजे झाले त्यापैकी काही महत्त्वपूर्ण राजाराणींचे नाव पुढे देत आहे.
● राजा सिमुक सातवाहन
● राजा कृष्ण सातवाहन
● राणी नागनिका
● हाल सातवाहन
● राणी गौतमी बलश्री
● गौतमीपुत्र_सातकर्णी
● वाशिष्ठीपुत्र पुलुमावी
● वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
● वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
● गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
● गौतमीपुत्र विजय सातकर्णी
● चंड सातकर्णी

या सर्वांमध्ये सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते #गौतमीपुत्रसातकर्णी यांच्या नावा अगोदर त्यांनी त्यांच्या आईचे म्हणजे गौतमी बलश्री हिचे नाव लावले यावरून आपली हिंदू मराठी मातृसत्ताक संस्कृती समजते. गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते. यांनी सातवाहन साम्राज्य खूप वाढवले व शक, कुशाण, हुन, ग्रीक यवन यांसारख्या विदेशी आक्रमकांपासून सनातन वैदिक आर्य हिंदू धर्माचे व दक्षिण भारताचे रक्षण केले.

गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळात भारतावर विदेशी शकांचे आक्रमण झाले होते या मध्य आशियातून आलेल्या लुटारू टोळ्या होत्या यांनी अफगाणिस्तान राजस्थान मार्गे भारतात प्रवेश केला यांच्यात दोन भाग पडले एक उत्तरी शक आणि एक दक्षिणी शक हे शक स्वतः ला क्षत्रप म्हणवत तर या दक्षिणी शकांचा राजा होता #नहपान हा #क्षहरात वंशातील शक राजा होता याने गुजरात सौराष्ट्र जिंकले पुढे हा महाराष्ट्रात घुसला याने सातवाहनांचा नाशिक जुन्नरचा प्रदेश देखील जिंकला.
या शकांच्या आक्रमणामुळे सातवाहनांना आपली राजधानी जुन्नर व पैठण सोडून काही काळासाठी दक्षिणेत जावे लागले त्यामुळे त्यांनी आंध्रप्रदेश मधील धरणीकोट व अमरावती या शहरांना राजधानी बनवले.

नहपान आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यामध्ये अनेक युद्ध झाले त्यांची अंतिम लढाई नाशिक गोवर्धन या ठिकाणी झाली. या लढाईमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराकरून नहपानाचा शिरच्छेद केला. या विजयाचे प्रतीक म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी यांनी #शालिवाहन_शक ही हिंदू कालगणना सुरू केली जिचे आज 1944 वे वर्ष चालू आहे व राजधानी पैठण मध्ये गोदावरी नदी किनारी एक #विजयस्तंभ बांधला ज्याला आज #तीर्थखांब म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकरणी यांनी #त्रिसमुद्रतोयपितवाहन (ज्याच्या घोड्यांनी तीनही समुद्राचे पाणी पिले आहे असा राजा), दक्षिणापथपती ( संपूर्ण दक्षिण भारताचा अधिपती) अश्या उपाध्या लावल्या.

त्यानंतर विदेशी ग्रीक यवन राजा डेमिस्ट्रियसने देखील सातवाहन साम्राज्यावर आक्रमण केले होते त्याचा देखील पराभव गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केला. व संपूर्ण दक्षिण भारताचे विदेशी आक्रमकांपासून रक्षण केले. नंतर उरलेल्या व युद्धात शरण आलेल्या या शक व ग्रीक यवन लोकांना सातवाहन साम्राज्याच्या बाहेर म्हणजे गुजरात कच्छच्या पुढे आजच्या राजस्थान पर्यंत हाकलून दिले. याच लोकांना नंतर राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले तेच आज स्वतःला #राजपूत म्हणवतात.

सातवाहन साम्राज्या बद्दल अधिक माहिती आपल्याला वायुपुराण व मत्स्य पुराणामध्ये मिळते. त्याचबरोबर सातवाहनांच्या शिलालेखांवर मिळते.
सातवाहन राजवंशाबद्दल समजगैरसमज:-
1) सातवाहन महाराष्ट्राचे होते की आंध्र प्रदेशचे…?
:- पुराणांमध्ये काही ठिकाणी सातवाहनांचा उल्लेख आंध्र सातवाहन असा आला आहे. व काही काळ त्यांची राजधानी आंध्र प्रदेश मधील धरणीकोट व अमरावती होती यावरून काहींनी त्यांना आंध्र प्रदेशचे घोषित केले. पण त्यांचा आंध्रप्रदेश शी संबंध नंतर आला ते मूळचे महाराष्ट्रातीलच आंद्रा नदी किनारी असलेल्या अंदर मावळचे होते म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर आंध्र सातवाहन झाला. व शकांचे सातवाहन साम्राज्यावर आक्रमण झाल्यानंतर त्यांना काही काळापुरते आपली राजधानी पैठण व जुन्नर सोडून दक्षिणेत जावे लागले तेव्हा त्यांनी आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती ला आपली राजधानी बनवले पण गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव केल्यानंतर परत त्यांनी पैठण व जुन्नर या आपल्या पहिल्या मूळ राजधान्यांनाच परत राजधानी बनवले.
2) सातवाहन हिंदू होते की बौद्ध…?
:- काहींनी सातवाहन राजांना बौद्ध घोषित केले त्यांनी काही बौद्ध भिक्खूंना राज्यात आश्रय दिला व बौद्ध स्तूप बांधायला दानधर्म केला याचा अर्थ ते बौद्ध होते असा होत नाही त्याचा काही संबंध नाही सातवाहन वैदिक हिंदू धर्माचे अनुयायी होते त्यांनी शालिवाहन शक ही हिंदू कालगणना सुरू केली. सातवाहन राजांनी वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ यांसारखे यज्ञ त्यांनी केले याची नोंद नाणेघाट शिलालेखात आहे जे वैदिक हिंदू करतात. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला व मंदिरे बांधली. त्यामुळे सातवाहन हे सनातन वैदिक हिंदूच होते.
3) सातवाहन क्षत्रिय मराठा होते की कुंभार…?
:- सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी बद्दल एक काल्पनिक कथा प्रचलित आहे की शालिवाहन हा कुंभाराचा मुलगा होता त्याने मातीचे पुतळे, हत्ती, घोडे बनवले आणि जेव्हा उज्जैनचा राजा विक्रमादित्याने पैठण वर आक्रमण केले आणि काही ठिकाणी राक्षसांनी आक्रमण केले असा उल्लेख आहे तेव्हा शालिवाहन राजाने त्या मातीच्या पुतळ्यात हत्ती घोड्यांमध्ये जीव ओतला आणि राजा विक्रमादित्य किंवा राक्षसांचा नाश केला या कथे वरून काहींनी त्यांना कुंभार घोषित केले. कथा वाचूनच तुम्हाला कळले असेल की ही काल्पनिक कथा आहे हिचा वास्तवाशी संबंध नाही गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट होते त्यांच्या अगोदरच्या 22 राजांची वंशावळ मिळते यावरून ते क्षत्रिय मराठा होते हे सिद्ध होते.
4)सातवाहन क्षत्रिय मराठा होते की ब्राह्मण..?
:- काही उत्तर भारतीय ब्राह्मण इतिहासकारांनी नाशिक शिलालेखाचा ज्याला नाशिक प्रशस्ती म्हटले जाते याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना ब्राह्मण घोषित तर केलेच पण क्षत्रिय विरोधी देखील घोषित केले. नाशिक प्रशस्ती मध्ये क्षत्रियांचा मानमर्दान केला म्हणजे माज मोडला असा उल्लेख आहे असं यांचं म्हणणं आहे पण जे स्वतःच क्षत्रिय आहेत ते स्वतःच्याच वर्णातील लोकांचे मानमर्दन का करतील…? आणि सातवाहनांची लढाई कुठल्या क्षत्रियांबरोबर झाली..? त्यांची लढाई तर विदेशी शकां बरोबर झाली आणि हे शक स्वतःला #क्षत्रप म्हणत होते. तर त्या शिलालेखात सातवाहनांनी शकांचे म्हणजे क्षत्रपांचे मानमर्दान केले असे वर्णन आहे. तर त्याचा चुकीचा अर्थ क्षत्रप ऐवजी क्षत्रिय असा यांनी काढला.
दुसरी गोष्ट त्या शिलालेखात ब्राह्मण शब्दाचा उल्लेख आहे तर ब्राह्मणांना भूमिदान व दान धर्म केले असा तो उल्लेख आहे याचा अर्थ त्यांनी ते स्वतः ब्राह्मण आहे असा लावला.

सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मानुसार राजा फक्त क्षत्रिय असतो त्यामुळे सातवाहन हे क्षत्रियच होते 450 वर्ष इतक्या दीर्घकाळ राज्य करणे व विदेशी आक्रमकांपासून साम्राज्याचे रक्षण करणे हे क्षात्र तेज एका क्षत्रियातच असते.
सातवाहन हे हिंदू क्षत्रिय मराठा होते आत्ताच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील #शिर्के आणि #साळवे कुळातील लोक सातवाहनांचे वंशज आहेत.

लेखक – आशिष इंगळे पाटील.

One thought on “महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास: सातवाहन राजवंश

  1. सातवाहन यांच्याबद्दल पूर्णपणे चुकीची माहिती सदर लेखात देण्यात आली आहे. एक तर लेखकाला पुरातत्व विषयाचे ज्ञान नाही आणि दुसरे म्हणजे लेखकाला भौगोलिक इतिहासाची ओळख देखील नाही.
    पुरातत्व अध्ययन असते तर स्थापत्य कला लक्षात आली असती त्याची ओळख झाली असती त्याच बरोबर सातवाहन यांचा राजवंश हा केवळ कथित कल्पनेवर आधारित गोष्टीवर नाही तर त्याचे ऐतिहासिक प्रमाण आहेत. सदर लेखक आपल्या लेखात म्हणत आहे कि सातवाहन राजांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरे बांधली असे वक्तव्य केले आहे हे अतिशय हास्यापद आहे कारण सातवाहन काळात मंदिर शैली अस्तित्वात च नव्हती तर त्यावेळी सातवाहन यांनी मंदिरे बांधली हे विधान निव्वळ हास्यापद आहे. सातवाहन वैदिक कि हिंदू हे त्यांनी केलेल्या यज्ञ यावरून नाही सिद्ध होत यज्ञ नागनिका राणी ने केलेत सातवाहन राजाने नाही हे समजायला हि पुराभिलेखांचे ज्ञान हवे आणि ते लेखकाला अजिबात दिसत नाही. म्हणून लेखकाने थोडे अधिक अध्ययन करणे आवश्यक आहे असे लिखाण करून सातवाहन यांची ओळख हिंदू क्षत्रिय होत नाही सातवाहन यांचे असंख्य पुराभिलेख सातवाहन यांचे प्राचीन धार्मिक अस्तित्त्व सांगतात अनेक शिलालेखात सातवाहन यांचे बौद्ध धर्मासाठी चे योगदान स्पष्ट आहे आणी त्याचे सबल पुरावे आहेत. सातवाहन यांच्या पुढे लागणारी आईची नावे हि देखील बौद्ध संस्कृती ची देन आहे हे लेखकाला माहिती नसावे असे दिसतेय. त्यामुळे सातवाहन हा किती हि खोट्या काल्पनिक गोष्टी धरून बांधून घेतल्या तरी ते वैदिक क्षत्रिय हिंदू होत नाहीत लेखकला हा संदेश द्यावा त्यांच्याकडे पुरावे आहेत का सातवाहन राजाने यज्ञ केल्याचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: